Skip to main content

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे.

"छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "

                बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.
                      दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शाहु महाराज यांनी म्हटले आहे ," तुम्ही ताबडतोब मजल   दरमजल बादशहाचे कुमकेस जावे.पुर्वी आमचे वचन औरंगजेब पातशहांशी गुंतले आहे की परचक्र आले तर आम्ही तुमची कुमक करावी .होईल तेथपावेतो सर्वस्वे साह्य करावे ."
                  मोगल बादशाही संकटात सापडली की आपण तिच्या साह्यास धावून जाऊ ,  हे औरंगजेबास दिलेले वचन तो मेल्यानंतर तीस वर्षांनी हा मराठ्यांचा राजा स्मरत होता व त्यानुसार आपल्या पेशाव्यास हुकूम करत होता ! आदिलशाही अथवा मोगलशाही संकटात येणे हीच आपली सुवर्णसंधी मानणाऱ्या शिवछञपतींच्या स्वर्गस्थ आत्म्यास या वेळी काय बरे वाटले असेल !
                       याच सुमारास आणखी एक पञ उपलब्ध आहे .हे पञ पेशव्याचा सातार्यातील शाहु महाराजांजवळचा हस्तक मल्हार तुकदेव पुरंदरे याने लिहिले आहे .त्यामध्ये मोगल बादशाहीसंबंधी महाराजांचे विचार त्याने उद्धृत केले आहे . तो लिहितो , " महमंदशहाची पातशाही गेली होती ती ईश्वरे कायम राखली. त्यास आपण राजकारण राखून अमीरूल - उमरा यासारखे व्हावे. पोटास व फौजांस लागेल ते आम्ही पातशाही माल पैदा करुन त्यातून घेऊ.उरला पैका ( पातशाही ) खजाना दाखल व्हावा किंवा फौजांस ( जहागिर्या ) आलाहिदा मागाव्या आणि सर्वास राजी करुन द्यावा , हा लौकिक मोठा . कैसा म्हणाल तरी जीर्णोद्धार देवालयाचा केल्यास नवीन लिंगाच्या स्थापनेपेक्षा अधिकोत्तर आहे .महमंदशहाचे पातशाहीचा बंदोबस्त केल्यास लौकिक मोठा .मोडून टाकण्यात लौकिक नाही . दुसरी गोष्ट हजारो चोरपोर खातील आणि पातशाही मोडल्याचा दोष आल्यावर दुसरे राजश्री छञपती स्वामीही पातशाही इच्छित नाही .जीर्णोद्धार केल्यास संतोष मानतील.
                          वरील पञातून शाहु महाराजांची दिल्लीच्या तख्ताविषयी कोणती मानसिकता होती , याची स्पष्ट कल्पना येते.कुठे आदिलशाहाचेच नव्हे तर दिल्लीचे तख्त काबीज करुन अखिल हिंदुस्थानात ' हिंदवी स्वराज्य '  पसरवण्याचे स्वप्न पाहणारे शिवछञपती आणि कुठे दिल्लीच्या तख्ताचे,संरक्षण करण्यात धन्यता मानणारे , नव्हे ते मोडून टाकण्यात दुर्लौकिक आहे , असे मानणारे त्यांचे नातू शाहु महाराज !  शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांच्या समोरची आव्हाने बिकट होती ; परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती , त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वभौम मराठी सत्तेची स्थापना केली ;आणि येथे शाहु महाराजांच्या काळात दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी प्राप्त होत असताना त्यांना त्या तख्ताचा देवालयाप्रमाणे जीर्णोद्धार करावा , असे वाटवे , ही खरी पेशवाईतील मराठ्यांच्या राजनैतिक इतिहासाची शोकांतिका होती . शाहु महाराजांना शिवाजी समजलाच नाही , हे खरे !

#मराठीशीहीचे_अंतरंग
#डॉ_जयसिंगराव_पवार
#वैभव_चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...